रविवार, १८ जानेवारी, २०२६

स्वतःला वेळ दिलेली एक आनंदाची सहल!

 




आपण अनेकदा आयुष्यात इतके गंभीर होतो की 'जगणे' विसरून फक्त 'टिकून राहणे' (Survive करणे) यालाच प्राधान्य देतो. पण मनमुराद हसणं, नाचणं आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे लक्झरी नसून ती एक गरज आहे, आणि हे लक्षात घेऊनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथील विद्यार्थ्यांची 'फक्त आनंद' देणारी एक सहल काढण्याचे ठरले! लातूर जिल्ह्यातील 'वृंदावन पार्क, चाकूर' हे त्यासाठी अतिशय योग्य ठिकाण असल्याचे निश्चित झाले!

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एस टी बसच हवी हा मुख्याध्यापकांचा आग्रह मान्य करून बीडच्या मान्यतेपासूनचा सर्व खडतर प्रवास पूर्ण करून आमची सहल शनिवारी चाकूरच्या दिशेने सकाळी साडेसहा वाजता रवाना झाली! सहलीची तयारी करण्यासाठी मुले रात्री पावणेतीन वाजता सुद्धा दचकून उठत होती हे आम्हाला बसमध्ये गप्पा मारताना कळले! 

Early bird catches the worm! आमची बस वृंदावन पार्कमध्ये पहिल्या क्रमांकांने आली होती मग फायदा तर निश्चितच होणार होता! सकाळचा नाश्ता, तिकिटं, प्रवेश प्रक्रिया लवकर झाली आणि मग सुरू झाली मजेदार सफर! डॅशिंग कारमध्ये एकमेकांना डॅश देताना काही डॅशिंग तर काही भित्रे झाले होते! झुकूझुकू आवाज काढत चालणारी रेल्वे तळ्याभोवती फिरताना अनेक स्तब्ध प्राण्यांच्या भेटी झाल्या; ब्रिजवर गाडी आली तेव्हा मुलांच्या आनंदाचा आवाज उंचावर गेला होता. 

ज्या तळ्याभोवती रेल्वेने प्रवास केला आता त्याच तळ्यात मुले बोटीत बसून फिरत होती, इंजिनावर चालणारी ही बोट बऱ्यापैकी आनंद देत होती. 

आता पुढे होती अशी काही खेळणी जी काहींच्या हृदयाचे ठोके वाढवणारी ठरली! ही बोट होती लाईटवर चालणारी; पण हिंदोळा घेऊन एकाच ठिकाणी जुन्या घड्याळातील दोलकासारखे आंदोलन करणारी! झोकाही होता जणू जंगली! बाहेर फेकून देणारा! वेगाची आवड असणाऱ्या मुलांना हा वेग कमी वाटला तर काही शिक्षकांना त्याची भीतीही वाटली.... अम्युजमेंट पार्क मधल शेवटचा टप्पा होता जरासा साहसी! लोखंडीरोपवर स्वतःला टांगून घेऊन तळ्यावरून जाण्याचा! शाळेतील बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी यात स्वतःचे साहस दाखवले; मुलीही कमी नव्हत्या! 

आता दुपारचा दीड वाजला होता आणि सकाळी दहापासूनची वेळ जणू पंख लावून भूर उडून गेली होती. घरून आणलेल्या डब्यांच्या खमंग सुवासाने भूक वाढली होती तरीही भरभर पोटात घास जात होते; कारण पुढचा टप्पा होता वॉटरपार्कचा म्हणजे जरा अधिकच आनंदाचा! 

जेव्हा आपण मनापासून हसतो किंवा गाण्यावर नाचतो, तेव्हा आपल्या शरीरात 'एंडोर्फिन' नावाचे 'फील गुड' हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स नैसर्गिकरित्या तणाव कमी करतात आणि आपल्याला आनंदी ठेवतात. हा आनंद वॉटरपार्क मध्ये पदोपदी मिळत होता. अगदी लहान विद्यार्थ्यांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांची काळजी घेत या ठिकाणी पाण्याची पातळी ठेवण्यात आली होती. साहसी खेळाडूंना आकर्षित करतील अशा राईड आणि मुलांना आनंद देतील अशी गाणी सोबत होती. रेन डान्स, वेव डान्स... सगळेच कसे आनंदाने डोलवणारे! सुमारे तीन तास विद्यार्थी आणि शिक्षक या आनंदात अक्षरशः चिंब भिजून गेले! कितीदा भिजले आणि कितीदा वाळले याची गणती नाही! 

पाच वाजता काहींच्या पोटातील कावळ्यांनी कावकाव केली आणि सगळ्यांनी रेस्टॉरंट गाठले. सकाळच्या सपक नाश्त्यापेक्षा आत्ताचा खमंग स्वयंपाक सगळ्यांनाच आवडला! तुटून पडल्यागत सर्वांनी तो फस्त केला. 

गाडीत बसल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना गाडीच्या आवाजात स्वतःच्या घोरण्याचा आवाज ताल धरून लांबून देण्यात मज्जा आली! अजूनही काही जण गाण्यांच्या, शब्दांच्या भेंड्या खेळता खेळता सहल कशी छान झाली याची चर्चा करत होती. 

परळी जवळ आल्यानंतर पुन्हा एकदा गाडीच्या शेवटी बसलेली मोठी मुले गाण्याच्या तालावर नृत्य करत इंदपवाडीत पोहोचली त्यावेळी रात्रीचे आठ वाजून गेले होते. 

धावपळीच्या जगात आपण सतत कोणाचे तरी ऐकत असतो किंवा कोणाला तरी उत्तर देत असतो. जेव्हा आपण मोकळा वेळ स्वतःच्या आवडीप्रमाणे घालवतो, तेव्हा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. हा "मी-टाइम" (Me-time) आपल्याला आतून समृद्ध करतो. चाकूरच्या सहलीने विद्यार्थ्यांना नक्कीच आतून समृद्ध केले असेल. रविवारच्या आरामानंतर समृद्ध झालेले विद्यार्थी सोमवारी पुन्हा एकदा शाळेच्या मैदानात नव्याने आपल्या चाकोरीबद्ध जीवनाला सुरुवात करतील या आशेने या सहलीचा समारोप झाला. 

सहल यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री चंद्रप्रकाश लोखंडे, जगदीश चौधरी, विष्णू ढाकणे, चंद्रशेखर फुटके, दीपक खंदारे यांनी मेहनत घेतली. विशेष योगदान लाभले शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री केशवराव मुंडे आणि श्रीमती शालिनी तांबारे मॅडम यांचे! त्यांनी स्वखुशीने सोबत येऊन छान वेळ दिला. 


शब्दांकन : चंद्रशेखर फुटके ( सहलीतील एक आनंदयात्री)






शनिवार, २५ ऑक्टोबर, २०२५

मध्यंतराचा तास.....


मध्यंतराची घंटा होण्यापूर्वी शेखर सरांनी अनुपस्थित विद्यार्थ्यांची चिट्ठी खिशात ठेवली. मध्यंतर होताच त्या विद्यार्थ्यांच्या घरी त्यांनी चक्कर मारली. आठवड्यात किमान दोन वेळा ते असे नित्य नियमाने करायचे. आठवड्यात किमान तीन ते चार वेळा त्यांचा तास सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट उशिरा येणाऱ्या पूनमच्या घरी आज जायचेच असे त्यांनी ठरवलेच होते. 


पाचवीचे वर्ग शिक्षक म्हणून गेले चार वर्ष ते या शाळेत कार्यरत होते. जून महिन्याचा हा शेवटचा आठवडा होता आणि नव्यानेच पाचवीच्या वर्गात आलेल्या मुलांना त्यांची शिस्त अजून माहिती नव्हती. पाचवी ते सातवी वर्गाला शेखर सर इंग्रजी आणि मराठी विषय शिकवत होते. विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित राहण्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दुष्परिणाम होतो हे ते जाणून होतेच; शिवाय विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती समजून घेतल्यास त्याच्या अभ्यासात त्याला अधिक चांगल्या प्रकारे मदत करता येईल याचा त्यांना विश्वास होता. 


ज्या वर्गांना ते शिकवत होते त्या वर्गातील बहुतेक विद्यार्थ्यांची घरे त्यांना माहीत होती. जुन्या विद्यार्थ्यांपैकी असणाऱ्या रोहितच्या शेजारी पूनमचे घर आहे एवढे विचारून ते ताडताड गल्ली बोळातून रस्ता पार करत पूनमच्या घरासमोर हजर झाले. सरांचे अधून मधून असे गावात येणे आता टोकवाडीकरांना चांगलेच माहीत झालेले होते. 


मध्यंतरामध्ये घरातून काहीतरी आणण्यासाठी किंवा काहीतरी नेण्यासाठी आलेली मुले आता सरांना दुरून पाहत होती. पूनमच्या घरासमोर सरांची पावले थबकल्यानंतर 'आता इथे काहीतरी होणार' या अपेक्षेने ही मुले पूनमच्या घराकडे पाहत होती. 


सरांनी घराच्या उघड्या दारातून आत डोकावले. "पूनम!" त्यांनी जरा करड्या आवाजातच हाक मारली.

आत कसलीतरी धावपळ उडाल्याचा आवाज आला. क्षणभरातच पूनम दाराआड उभी राहिली. तिचा शाळकरी युनिफॉर्म चुरगळलेला होता आणि केस विस्कटलेले होते. समोर शेखर सरांना पाहून तिचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला. तिच्या डोळ्यांत पाणी जमायला सुरुवात झाली होती.

"सर... तुम्ही...?" ती अडखळत बोलली.

"आज शाळेत का आली नाहीस? आणि रोज तास सुरू झाल्यावर पंधरा-वीस मिनिटांनी का येतेस?" सरांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली.

पूनमने मान खाली घातली. ती काहीच बोलत नव्हती, फक्त हुंदके देत होती. बाहेर जमलेली पोरे 'आता सर पूनमला नक्की ओरडणार किंवा मारणार' या अपेक्षेने कान टवकारून ऐकत होती.

तेवढ्यात घरातून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सरांची नजर पूनमला ओलांडून आत गेली. घरात फारसे सामान नव्हते. एका कोपऱ्यात फाटक्या गोधडीवर एक वर्षाचे बाळ रडत होते आणि त्याच्या बाजूलाच तीन-चार वर्षांचा एक मुलगा भाकर तुकडा खात बसला होता.

"आत अजून कोण आहे?" सरांचा आवाज आता थोडा नरम झाला होता.

पूनम बाजूला झाली. "माझी लहान बहीण आणि भाऊ हायेत, सर."

"आणि आई-बाबा कुठे आहेत?"

"आई सकाळीच दुसऱ्याच्या शेतात निंदायला (कामाला) गेलीया. बाबा... बाबा नाहीत..." पूनमने डोळे पुसले.

शेखर सरांना क्षणार्धात सगळी परिस्थिती समजली. पूनमच्या आईला पहाटेच कामावर जावे लागत होते. या दोन लहान भावंडांना तयार करणे, त्यांना खाऊपिऊ घालणे आणि भावाला जवळच्या अंगणवाडीत सोडून मगच पूनमकडे शाळेत यायला वेळ उरत होता. रोजची पंधरा-वीस मिनिटांची लढाई तिला याचसाठी करावी लागत होती. आणि आज, लहान ताई आजारी असल्याने रडत होती, त्यामुळे तिला शाळेत येणे जमलेच नव्हते.

सरांनी एक दीर्घ श्वास घेतला. बाहेरच्या मुलांना वाटले होते तसे सर ओरडले नाहीत. ते आत आले. त्यांनी रडणाऱ्या बाळाला उचलून घेतले आणि पूनमच्या पाठीवर हात ठेवला.

"ताईला ताप आलाय का? काही खाल्लं का तुम्ही लोकांनी?"

पूनमने नकारार्थी मान हलवली.

सरांनी खिशात हात घातला. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या चिट्ठीसोबत त्यांनी काही पैसेही ठेवले होते. त्यांनी त्यातल्या काही नोटा पूनमच्या हातात ठेवल्या. "आधी ताईला दवाखान्यात घेऊन जा आणि सगळ्यांसाठी काहीतरी खायला आण. आज शाळेत येऊ नकोस. मी मुख्याध्यापकांशी बोलतो."

पूनम सरांकडे फक्त कृतज्ञतेने पाहत राहिली.

बाहेर जमलेल्या मुलांना काहीच कळेना. सरांनी ना पूनमला मारले, ना ओरडले. उलट ते तिच्या घरात गेले आणि शांतपणे बाहेर आले. सरांची पावले शाळेकडे वळली.

मध्यंतराची घंटा संपल्याचा आवाज दूरवर ऐकू येत होता. शेखर सरांच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. विद्यार्थ्याची कौटुंबिक परिस्थिती समजून घेतल्यास त्याला अधिक चांगल्या प्रकारे मदत करता येते, हा त्यांचा विश्वास आज खरा ठरला होता. पूनमचा उशिरा येण्याचा प्रश्न आता केवळ 'शिस्तीचा' राहिला नव्हता, तो 'जबाबदारीचा' झाला होता. 'आता यावर कायमचा तोडगा काढायला हवा,' हा विचार करतच सरांनी शाळेचे गेट ओलांडले.


चंद्रशेखर फुटके 

93250 63512

सोमवार, ३ मार्च, २०२५

प्रशिक्षणाने दिले मला नवे बळ!





अज्ञानातील नुकसानामुळे होणाऱ्या खर्चापेक्षा प्रशिक्षणावर होणारा खर्च कमी असतो आणि म्हणूनच शैक्षणिक धोरणामध्ये बदल झाले की शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या खर्चाचा विचार न करता शिक्षकांना नवे धोरण समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते आणि माझ्या मते हे योग्यच असते.
नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ येथे 24 फेब्रुवारी ते 1 मार्च  दरम्यान माझे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० तिसऱ्या टप्प्यात पूर्ण झाले. शिक्षकांच्या जुन्या धारणांना उजाळा देत असताना परिपूर्ण तयारी करून, अभ्यास करून आलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 चा परिचय करून दिला आणि त्यातल्या बदलांना आपल्या दैनंदिन शैक्षणिक जीवनात कसे अंमलात आणावयाचे हे अतिशय सुंदररित्या समजावून सांगितले. 
सहावी ते आठवी वर्गांना अध्यापन करत असलेल्या शिक्षकांच्या कुलास श्री अमोल कांबळे सर कुलप्रमुख होते. उद्घाटनानंतरच्या अगदी सुरुवातीच्या तासामध्ये त्यांनी प्रशिक्षण योग्य रीतीने पार पाडण्यासाठी झालेल्या नियमावलीचे पालन कसे करावे हे समजावून सांगत प्रशिक्षण घेण्यास आलेल्या शिक्षकांनी काय केले म्हणजे हे प्रशिक्षण व्यवस्थित संपन्न होईल हे शिक्षक बांधवांना आवडेल अशा भाषेत, अगदी त्यांच्या बारीकसारीक सवयींचा आदर करत समजावले. हे मला अधिक भावले. या कुलामध्ये अगदी शेवटपर्यंत टिकून राहिलेल्या शिस्तीमध्ये मला या सुरुवातीच्या मायाळू सूचनांचा प्रभाव जाणवला. 
SQAAF शाळा मूल्यांकनाचा हा अगदी नवीन विषय घेऊन श्री शिवराम राडकर सर यांनी पहिल्या तासिकेस सुरुवात केली. प्रशिक्षणास येण्यापूर्वीच तसा ओझरता हा विषय कानावर आलेला होता; परंतु प्रशिक्षणामध्ये त्यातील क्षेत्र, उपक्षेत्र, मानके, काय करावे, काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती मिळाली. प्रत्येक मुद्द्यांना विस्तार करत असताना उदाहरणे देण्याची आणि ओघवत्या भाषेत समजून सांगण्याची त्यांची पद्धत मला आवडली. चौथ्या दिवशीही त्यांची समग्र प्रगती पत्रकावर एक तासिका झाली. 
SQAAF या विषयात आता मी नेमका 'प्रवाह' मध्ये होतो आणि त्यातून मला 'पर्वत' भागात आणण्याचे काम दुसऱ्या तासिकेत श्री जाधव बाळासाहेब सर यांनी केले. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, समाज या सर्वांची भूमिका समजावून घेतली. दिव्यांग विद्यार्थी, व्यवस्थापन ते थेट 'लाभार्थ्यांचे समाधान' पर्यंतचे नवे ज्ञान या तासिकेत झाले. 
पहिल्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात शिक्षक मित्रांसाठी महत्वाचा असणारा 'क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया' हा विषय घेऊन श्री बडे शशिकांत सर उपस्थित झाले. शांत, संयमी आवाज आणि मुद्द्यानुसार पुढे जाण्याची त्यांची वृत्ती छान वाटली. लक्ष्ये, ध्येये, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती या गोष्टींवर त्यांनी टाकलेला प्रकाश नवे शैक्षणिक धोरण समजावून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरला. चौथ्या दिवशी परत एकदा दुपारच्या सत्रात श्री शशिकांत बडे सर यांनी क्षमतावर आधारित मूल्यांकनाची पद्धत समजावून सांगितली. 
वर्गातील शेवटच्या व्यक्तीचेही अवधान खेचून घेणारा पहाडी आवाज घेऊन आले ते श्री सरवदे आर बी सर! क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनीती ही पारंपारिक मूल्यमापन पद्धतीपेक्षा वेगळी कशी आहे हे चर्चात्मक पद्धतीने त्यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींना समजावून सांगितले. मूल्यांकनाची विशिष्ट रचना समजून घेण्यासाठी त्यांच्या तासिकेचा उपयोग झाला. 
दुसऱ्या दिवशी NEP 2020 अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची सखोल माहिती देणारी पहिली तासिका सुरू झाली सकाळच्या सत्रात ती श्री सूर्यवंशी सर यांची. "नूतन भारत का सपना, हर बच्चा समझे...." असे म्हणून वाक्य पूर्ण करण्यासाठी पुढील शब्द त्यांनी सोडून दिला, सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनी "अपना" हा शब्द लावून ते वाक्य पूर्ण केले आणि सरांनी बरोबर आम्हा सगळ्यांना तिथे पकडले! "नूतन भारत का सपना, हर बच्चा समझे भाषा और गणना।" असे ते वाक्य होते, घोषणा होती! FLN, ECCE, Logical thinking भारतीय संविधान, तंत्रज्ञान, मूलभूत कौशल्ये, AI चा शिक्षणात समावेश अशा अनेकविध विषयांना स्पर्श करत त्यांनी ही तासिका अतिशय कौशल्याने पूर्ण केली. शेवटच्या दिवशी रुबिक्स ही मूल्यांकनाची पद्धतही श्री सूर्यवंशी सर यांनी उदाहरणांसह छान समजावून दिली. 
शिक्षणाच्या नव्या रचनेचा 'पायाभूत स्तर' विस्तृतपणे समजला तो श्री रवींद्र जोशी सरांच्या दुसऱ्या तासिकेत. प्रत्येक बालक शिकू शकते आणि शिक्षकांना आता सुलभकाची भूमिका बजावयाची आहे अशा गोष्टींची भर देतानाच या स्तरावर खेळ आणि कृती आधारित शिक्षण द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. या तासिकेत मला माझ्या शाळेतील कृतीवर आधारित उपक्रमांची माहिती देण्याची संधी त्यांनी दिली. चौथ्या दिवशी दुसऱ्या तासिकेत श्री रवींद्र जोशी सर यांनी प्रश्न निर्मितीचे गटकार्य पूर्ण करून घेतले आणि आम्हाला सादरीकरणाची संधीही दिली. यानिमित्ताने गटकार्य करत असताना नवे मित्र मिळाल्याचा आनंद झाला. 
"एखाद्या बॉटलची क्षमता एक लिटरची आहे, आता ती क्षमता तुम्ही कशी वाढवू शकता? नाही ना वाढवता येत? मग शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कशासाठी?",  असा चिंतनात्मक प्रश्न वर्गात देऊन श्री अमोल कांबळे सर यांनी आपल्या तासिकेला दुपारच्या सत्रात सुरुवात केली. Capacity and Competency या दोन इंग्रजी शब्दांचे अर्थ सांगताना क्षमता निर्जीवातली वाढवता येणार नाही परंतु सजीवातली वाढवता येईल म्हणूनच सजीवांसाठी Competency हा शब्द योग्य आहे हे सर्वांना छानच समजले. शैक्षणिक धोरणांचा प्रवासही त्यांनी क्रमबद्ध पद्धतीने समजावून दिला. 
'क्षमता आधारित प्रश्न प्रकार' या विषयाची तासिका श्री इंगोले सर यांनी घेतली. प्रश्नांची रचना, त्यांचे प्रकार, कसे असावेत आणि कसे नसावेत याबद्दल सविस्तर माहिती त्यांच्या तासिकेतून मिळाली. पाचव्या दिवशीच्या तासिकेत श्री अमोल सरांनी समग्र प्रगती पत्रकाबद्दलची चर्चा घडवून आणली आणि प्रशिक्षणार्थींच्या मनात असणाऱ्या शंका दूर केल्या.
उत्तम कलाकार, चित्रकार आणि कवी असलेले श्री सिद्धेश्वर इंगोले सर यांना ऐकण्याची संधी मिळाली ती 'क्षमता आधारित प्रश्न प्रकारावर.' क्षमता आधारित प्रश्न प्रकाराबद्दलची माहिती देत असताना त्यांनी सॉक्रेटिसची आठवण करून देत उत्तमपणे प्रश्न प्रकार समजावून दिले. प्रश्न कशाप्रकारे अध्ययन अध्यापनात उपयुक्त असतात हे त्यांच्या मांडणीतून अधिक स्पष्ट झाले.
तिसरा दिवस अर्थात 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन. सर्व कुलांना एकत्र करून मराठी भाषा गौरव दिनाची माहिती देण्यात आली. 
आमच्या कुलावर पहिली तासिका झाली पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणारे कवी, शाहीर श्री अनंत मुंडे सर यांची. खळाळत जाणारा प्रवाह जसा सहज मार्ग काढत पुढे जातो तसेच या तासिकेतील आशय, मुद्देही सहजगत्या आणि आशयानुरूप कवितांच्या सोबतीने श्री अनंत मुंडे सरांच्या गोड आवाजात पुढे जात होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणात असणारे विषय आणि त्यांचे महत्त्व याबद्दल त्यांनी माहिती दिली. आव्हानाशिवाय प्रगती होऊ शकत नाही हे सांगत असताना त्यांनी गरुडाची गोष्ट सांगितली. माजलगाव चे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री प्रभाकर साळेगावकर यांच्या 'बळ उडाया दे रे' या कवितेने त्यांनी आपल्या तासिकेचा समारोप केला. 
आपलाच शिष्य आपल्यासमोर उभा राहून उत्तम पद्धतीने अध्यापन करत असल्याचा आनंद गुरूला जसा मिळतो तसाच आनंद श्री संजय कळसे सर यांच्या तासिकेत मला मिळाला. मी दिलेल्या अनेक प्रशिक्षणामध्ये श्री संजय कळसे सर प्रशिक्षणार्थी म्हणून असायचे. प्रशिक्षक म्हणून स्वतःची प्रगती कशी होत गेली हे सांगत असतानाच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील अनेक मुद्द्यांना उत्तमपणे स्पर्श केला. शिक्षणाच्या धोरणात बदल होत असताना शिक्षकांनी ते सकारात्मकपणे कसे स्वीकारावेत यावर त्यांचा भर होता. 
दुपारच्या सत्रात होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड अर्थात समग्र प्रगती पत्रकाबद्दलची सविस्तर माहिती श्री मोहन गित्ते सर यांनी दिली. या घटकाचा त्यांनी उत्तम अभ्यास केलेला असल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा करतच प्रगती पत्रक लिहिण्यात झालेला हा बदल त्यांनी उत्तमपणे समजावून सांगितला. विद्यार्थी स्वतः, त्याचा मित्र, पालक आणि शिक्षक या सर्वांवरच आता या प्रगती पत्रकाच्या मुद्द्यांना भरण्याची जबाबदारी आहे. 
काही चित्रपटात जशी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्याची ताकद असते अगदी तशीच ताकद आपल्या वाणीत असणारे श्री जीवन बाजगीर सर! प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आवडतील असे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात असणारे मजेशीर उदाहरणे देत आपला मुद्दा अगदी सहजपणे पटवून देणारे जणू इंदुरीकर महाराजांचे पट शिष्य! SQAAF बद्दलच्या त्यांच्या तासिका हसतखेळत संपन्न होत. या पाच दिवसात दोन तासिका मध्ये श्री जीवन बाजगीर सर यांनी दिलेली समग्र प्रगती पत्रकाची माहिती कायम लक्षात राहील. 
एकंदरीतच हे प्रशिक्षण माझ्या अनेक क्षमता वाढवणारे ठरले. 
१) मोबाईल पासून दूर राहून प्रत्यक्ष आपल्यासमोर सादर होणाऱ्या व्याख्यानास उपस्थित राहता आले आणि त्यासाठीची असणारी माझी बैठक क्षमता वाढवता आली. 
२) मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून तो मध्यंतरातच पाहायचा हे मी पक्के ठरवलेले होते त्यामुळे मोबाईल पासून दूर राहणे मला शक्य झाले.
 
३) सज्जनांच्या संगतीत अनेक विषयांना स्पर्श होत असतो आणि कधी कधी त्यांच्या सुंदर उपक्रमांना आपल्या शाळेत राबवण्याचे निश्चय पक्के होत असतात. अनेक चांगल्या गोष्टी समोर येत असतात; जसे की मिरवटचे श्री अरविंद चौधरी सर यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विमान सहलीला कसे नेता आले हा चांगला मुद्दा सगळ्यांसोबत शेअर केला.
४)तालुक्यातील अनेक अशा तज्ज्ञ शिक्षकमित्रांशी मध्यंतरामध्ये गप्पागोष्टी करता आल्या. 
५) सुरुवातीला झालेल्या पूर्व चाचणीमध्ये मला 19 मार्क मिळाले होते आणि शेवटच्या उत्तर चाचणीत मला 30 मार्क मिळाल्याचाही आनंद होता. 
६) सुरुवातीपासून प्रत्येक तासिकेत नोट्स घेण्याचे मी ठरवलेच होते. मोबाईल मुळे आता लिहिणेही फार कमी झाले आहे तेव्हा हाताची लिहिण्याची क्षमता वाढू द्यायची म्हणून हा निश्चय होता. त्याचा फायदा उत्तर चाचणीत झालाच; कारण लिहिल्यामुळे बरेचस मुद्दे स्मरणात कायम राहिली होते.
७) शिक्षकांनी स्वतःला व्यवसायासाठी किंवा आनंदाने होणाऱ्या या सेवेसाठी, या सर्वांग सुंदर धर्मासाठी स्वतःला सज्ज करावे आणि हे प्रशिक्षण किंवा यासारखी प्रशिक्षणे जेव्हा जेव्हा येतील तेव्हा ते तितक्याच तन्मयतेन घ्यावेत असा माझा एक प्रेमळ सल्ला... 
श्री चंद्रशेखर फुटके 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी, केंद्र मिरवट 


गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

ऑलम्पियाड स्पर्धेत स्कॉलर केजी स्कूलचे घवघवीत यश


 नॅशनल ओलंपियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल ओलंपियाड परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभागी होत स्कॉलर केजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण होऊन तेरा गोल्ड मेडल आणि एक टॉपर मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. 


स्कॉलर केजी स्कूल परळी वैजनाथच्या प्राचार्या सौ सुजाता चंद्रशेखर फुटके यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, आमच्या शाळेने यावर्षी प्रथमच इंटरनॅशनल ओलंपियाड स्पर्धेत विद्यार्थ्यांना बसवले आणि त्यांची तयारी करून घेतली होती. 
इंग्रजी गणित हिंदी विज्ञान फोनिक्स या विषयात विद्यार्थ्यांनी 13 गोल्ड मेडल्स एक टॉपर मेडल मिळवत एकूण 14 मेडल्स ची प्राप्ती केली आहे. 


सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे कु राजलक्ष्मी परमेश्वर गुट्टे हिने विज्ञान विषयात 9 वा इंटरनॅशनल रँक मिळवला आहे! कुमारी राजलक्ष्मी हिने इंग्लिश, हिंदी, गणित फोनिक्स आणि विज्ञान या वेगवेगळ्या विषयांमध्ये ही स्पर्धा दिली आणि उत्तीर्ण झाली. 


कु आराध्या अशोक रोकडे, काव्या अनिल शंकुरवार,  ओवी विजय गायकवाड, पद्माक्ष योगेश व्यवहारे, शिवांश गजानन मालेवार आणि सौम्या जितेंद्र नव्हाडे या विद्यार्थ्यांनीही गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये ए प्लस प्लस ग्रेड घेऊन सेकंड राउंड साठी सिलेक्ट झाले आहेत.


विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि  शिक्षिकांचे अभिनंदन प्राचार्या सौ सुजाता फुटके व शाळेचे मार्गदर्शक श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले आहे. 

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत कासारवाडी शाळेचे यश

 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कला व संचलनालयाच्या वतीने आयोजित एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत यश मिळवले असून 13 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षक नसतानाही या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रिया अशोकराव काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तसेच मार्गदर्शन करून यावर्षी प्रथमच एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेसाठी तयारी करून घेतली. 


श्रीमती काळे मॅडम यांच्या प्रयत्नास प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांनीही मेहनत केली आणि या गावातून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या वर्गाचा एकूण पट १८ विद्यार्थ्यांचा आहे. त्यापैकी तेरा विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले असून तीन विद्यार्थिनी बी ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत. 


उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती प्रिया कळम काळे मॅडम यांचे मुख्याध्यापक श्री राठोड, सरपंच सौ उर्मिला बंडूभाऊ गुट्टे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

पैसे दिल्याचा डुप्लिकेट ॲप! व्यापाऱ्यांनो सावधान!






 फोन पे सारखाच दिसणारा डुप्लिकेट ॲप सध्या निघाला असून त्यातून तुम्हाला फोनवरून पैसे दिल्याचे दिसत आहे परंतु प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर काहीच पैसे आलेले नसतात.... पोलिसांनी तयार केलेला वरील व्हिडिओ पहा...

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेतला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल विचार व्यक्त करून अभिवादन केले. 


शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री असणाऱ्या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी अक्षरा संदीप गुट्टे हिने केले.
सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय मंत्रिमंडळाच्या व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. 


उपस्थित शिक्षकांचे स्वागत शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने झाल्यानंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षकांच्या वतीने श्रीमती चट शुभांगी, श्रीमती प्रिया काळे आणि श्री चंद्रशेखर फुटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.











गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

तुमचे Whatsapp होईल हॅक! सावधान......




तुमचे Whatsapp होईल हॅक! सावधान अशा प्रकारच्या फाईल ओपन करू नका! 
सध्या व्हाट्सअप वर आपल्याच ओळखीच्या क्रमांकावरून एक फाईल पाठवली जाते आणि आपण ती उत्सुकतेने उघडून पाहतो आणि क्षणात आपल्या whatsapp वरून ताबा दुसऱ्याच कोण्याच्या हाती जातो! आपले सर्व क्रमांक, पर्सनल डेटा त्या व्यक्तीच्या हाती गेल्याने बऱ्याचदा आर्थिक नुकसान होते. समोरच्या व्यक्तीने मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी असे केलेले नसते तर नकळतपणे ती व्यक्ती अशा प्रकारे फसलेली असते आणि त्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व क्रमांकांना ही फाईल आपोआप पाठवली जाते...  



कशी ओळखावी अशी फाईल?
कोणत्याही व्यक्तीला आपण संवाद न साधता त्याने आपल्याला ऍप्लिकेशन फाईल पाठवली असेल तर ते संशयास्पद असते. याच फाईल मध्ये आपला मोबाईल हॅक करणारी व्हायरस असतात. या फाईलची नवे काहीही शकतात आणि शक्यतो अशी जी आपल्या कामाची असू शकतात. जसे की PM किसान माहिती, लाडकी बहीण योजना, SBI Reward, मोफत डेटा अर्ज या प्रकारच्या फाईल.  



या प्रकारच्या फाईलच्या शेवटी .APK (डॉट एपीके) असते. (चित्र पहा) अशा प्रकारची फाईल ओळखून कधीच Open करण्याची चूक करू नका. 




आपला मोबाईल लहान मुले किंवा किंवा थोड्याच शिक्षित असलेल्या स्त्रियांच्या हाती देत असाल तर त्यांना ही माहिती वाचण्यास सांगा. 
ही पोस्ट आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. 



 

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

हा नवा प्रकार तुम्हाला फसवू शकतो!


 

ऑनलाइन देवाण-घेवाण जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने आपल्याला फसवणाऱ्या लोकांची संख्या आणि त्याचे वेगवेगळे प्रकार वाढत आहेत. 


नुकताच एक प्रकार जो ऐकण्यात आला तो अचंबित करणारा आहे. या प्रकारामध्ये तुमच्या अकाउंट वर तुम्हाला अनोळखी असणारा एखादा व्यक्ती पैसे टाकतो. थोड्यावेळाने तुम्हाला फोन येतो की चुकून माझ्याकडून तुमच्या अकाउंट वर अमुक रक्कम पडली आहे. माझ्याकडून चुकून त्यातले नंबर वेगळे दाबले गेले आणि ती रक्कम तुम्हाला आली. खूप विनंती दर्शक भाषा आणि  गरजू असल्याचे दाखवत असल्यामुळे तुम्हाला कोणतीही शंका येत नाही. मग सदर व्यक्ती तुम्हाला ही रक्कम ज्या खात्यावरून पाठवलेली आहे त्या खात्यावर न टाकता दुसऱ्याच एखाद्या खात्यावर टाकण्यास सांगते. तुम्हाला अजिबात शंका येत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर तुम्हाला आलेली रक्कम ट्रान्सफर करता आणि झाली गोष्ट विसरून जाता.... 


साधारण आठ दिवसा नंतर बरोबर तेवढीच रक्कम परत एकदा तुमच्या अकाउंट वरून ज्या अकाउंट वरून आली होती त्या अकाउंटला परत जाते .... आपोआप.....  तुम्हाला न कळता.... तुम्ही बँकेत तक्रार करायला गेल्यानंतर तुम्हाला मॅनेजर सांगतात की ज्या अकाउंट वरून तुम्हाला चुकून रक्कम आली होती त्या व्यक्तीने बँकेमध्ये त्याच दिवशी अर्ज करून ही रक्कम परत करण्याची विनंती बँकेला केलेली होती... प्रोसेस मध्ये वेळ गेल्यामुळे ही रक्कम आठ दिवसानंतर त्या व्यक्तीला परत पाठवण्यात आली...  
आता पश्चाताप करण्याची आणि संबंधित व्यक्तीला फोन करून ती रक्कम मला पाठवून द्या असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर येते आणि त्या व्यक्तीने तुमचा फोन ब्लॉक करून टाकलेला असतो! 



काय करावे अशावेळी? एखाद्याने तुम्हाला काही रक्कम पाठवून देऊन ती चुकून तुमच्या खात्यावर आल्याची सांगितले तर तुम्ही त्या व्यक्तीला तू स्वतःच बँकेत जा आणि माझ्या खात्यावरची रक्कम परत घेण्याची विनंती कर असे सांगावे. फारच ओळखीचा निघाला तर ज्या अकाउंट वरून तुम्हाला रक्कम आली आहे त्याच अकाउंटला ती रक्कम परत करण्याचे सांगावे; परंतु चुकूनही दुसऱ्या अकाउंटला ती रक्कम ट्रान्सफर करू नये... 

सावध रहा : आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांना, मित्र-मैत्रिणींना ही पोस्ट शेअर करून सावध करा! 

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

.... आणि आपत्कालीन स्थितीत मी!





 

"सर, माझी तब्येत बरी नाही आणि मी पप्पासोबत दवाखान्यात जात आहे"


"सर, मी मामाच्या गावी आली आहे"


"सर, मी एकटी तयार आहे आणि बाकीच्या कोणीच नाहीत!"


सगळ्यात कहर म्हणजे हा फोन होता!....
"सर, ज्या वर्गात पाईप आणि कॅन्ड ठेवले होते त्याची चावी हरवली आहे!"


आता हताश होऊन वाळणाऱ्या झाडांची काळजी मनात येवून सरळ आपणच जावून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माझ्या शाळेतील झाडांना पाणी देण्यासाठी मी निघालो. घरी असणारे पाईपचे तुकडे, कनेक्टर, बकेट्या माझ्या फोर व्हिलर मध्ये घेतल्या.
 
"14 किलोमीटर जावून परत यायचे आहे म्हणजे 28 किलोमीटर पैकी 15 ते 20 किलोमीटर गाडी तुला शिकायला मिळेल...येतेस का?" नुकतेच ड्रायव्हिंग लायसन्स घेतलेल्या कन्येला ही ऑफर आवडली आणि ती सोबत आली.


दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्याच्या शेवटच्या दिवशी शाळेतील सगळी कामे व्यवस्थित पूर्ण करायची ठरले होते त्याप्रमाणे सगळे चालू होते. सुट्टीच्या काळामध्ये झाडांना पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून, त्यांना तारीखनिहाय नियोजन देवून, पाणी कसे द्यावयाचे हे समजून सांगितले होते. एका वर्गात शंभर फुटी रबरी पाईप आणि पाच वॉटर कँड तयार ठेवली होती. 


पण हे सगळं फेल गेले होते; म्हणून आपत्कालीन परिस्थितीत सुट्टीत शाळेत आलो होतो!

 
गावाच्या मैदानाच्या ओट्यावर करमणूक म्हणून काही गावकरी ठाण मांडून गप्पात रममाण झाले होते. दोन - चार तरुण (चेहऱ्यावरून एखाद- दुसरा माझा जुना विद्यार्थी असणारी) मुले हाती मोबाईल घेऊन कुठल्याशा गेम खेळण्यात दंग होती. एकालाही असे वाटले नव्हते की 'शाळा आपली, गाव आपले तर दोन बकेट पाणी देण्यासाठी आपण जावे!' असो... "तुम्ही नाही आलात तर तुमची पगार थोडीच बंद पडणार आहे?!" असे जर उत्तर दिले तर मी निरुत्तर होईल म्हणून कोणास काही न बोलता आपले काम केले. आपणही मनाच्या आनंदासाठी हे करताना कोणाकडून अशी अपेक्षा ठेवणे योग्यही नव्हते! 

इयत्ता तिसरीत शिकणारी कु श्वेता धनराज दहिफळे ही एकमेव विद्यार्थीनी पूर्णवेळ सोबत थांबली... तिच्यासह लेकीने मदत केल्याने अर्ध्यातासात मनाजोगते काम झाले होते.


बुधवारी 6 नोव्हेंबर 2024 रोजी कु कोमल कृष्णा गुट्टे, अक्षरा सचिन गुट्टे, पूनम बालासाहेब गुट्टे आणि यशश्री कृष्णा गुट्टे यांनी झाडांना पाणी दिले.