मंगळवार, ३ मार्च, २०२६

अभ्यासाची ऊर्जा वाढवत आहेत सामान्य ज्ञानाच्या परीक्षा!


 


*सामान्य ज्ञान स्पर्धा पेटवत आहेत अभ्यासाची ऊर्जा!*

 सामान्य ज्ञानाची पुस्तिका दिल्यानंतर स्पर्धांची घोषणा झाली आणि पहिल्या स्पर्धेतील विजेत्यांना जेव्हा आकर्षक प्रमाणपत्र आणि नगदी बक्षीस मिळाली तेव्हा दुसऱ्या स्पर्धेसाठी विद्यार्थी उत्साहाने तयारीला लागले होते.

सामान्य ज्ञानाच्या परीक्षा क्रमांक एक मध्ये पुस्तिकेत असलेले प्रश्न क्रमांक एक ते शंभर देण्यात आले होते.

वैयक्तिक आणि गटात अभ्यास कसा करावा एकमेकांना प्रश्न कसे विचारावेत याचे मार्गदर्शन गुरुजनांनी केल्यानंतर विद्यार्थी मधल्या वेळेत, घरी आणि गटात बसून, वेळ मिळेल तेव्हा छान अभ्यास करत होते.

स्पर्धा क्रमांक एक तीन फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. छापील प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर विद्यार्थ्यांना तीस मिनिटांचा वेळ सोडवण्यासाठी देण्यात आला. बाहेरच्या मैदानात, भरपूर अंतर घेऊन, कॉपीमुक्त वातावरणात या परीक्षा संपन्न होत आहेत. इयत्ता 4 थी ते 7 वी या प्रत्येक वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला नगदी 25 रुपये तसेच आकर्षक प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात आले.

'आता दुसऱ्या परीक्षेत माझा क्रमांक काढतोच!' असे म्हणत जिद्दीने मुली आणि मुले अभ्यासाला लागली होती. 28 फेब्रुवारीला दुसरी परीक्षा तेवढ्याच उत्साहात संपन्न झाली. 


*सुपर ग्रुप* 


परीक्षा क्रमांक एक मध्ये जे विद्यार्थी प्रत्येक वर्गातून प्रथम आलेले होते ते सुपर ग्रुप मध्ये निवडण्यात आले. त्यांना आता दुसऱ्या परीक्षेत प्रश्न क्रमांक 1 ते 100 मधील 10 प्रश्न आणि 101 ते 200 मधील 15 प्रश्न अशी वेगळी 25 प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती. यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगला व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांना त्या वर्गातून बक्षीस मिळण्याची संधी मिळावी हा दुहेरी उद्देश होता.

सुपर ग्रुप मध्ये चार विद्यार्थी गेल्यामुळे प्रत्येक वर्गातील राहिलेल्या विद्यार्थ्यांना 'आता माझा नंबर येईल' म्हणून आशा निर्माण झाली होती आणि ते जिद्दीने अभ्यासाला लागले होते. 


*दुसऱ्या परीक्षेची वैशिष्ट्ये*

इयत्ता पाचवी वर्ग अभ्यासात अधिकच जिद्दीने लागल्याचे दिसून आले. 25 पैकी 25 गुण घेऊन दोन विद्यार्थी समान स्थितीवर होते. (स्वप्निल आणि अमृता) त्यांना तोंडी प्रश्न विचारण्यात आले आणि त्यातून एकाचा प्रथम क्रमांक काढण्यात आला. विशेष म्हणजे या वर्गातून प्रथम आलेला विद्यार्थी 25 गुणाचा आणि द्वितीय आलेला विद्यार्थी  (आदित्य) 24 गुणांचा म्हणजे गुणवत्तेने आणि संख्येने अधिक अभ्यासाला लागलेला हा वर्ग असे या परीक्षेच्या निमित्ताने दिसून आले. या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गुण अधिक घेण्यासाठीची सकारात्मक स्पर्धा निर्माण झालेली आहे. एकमेकांना छान मदत करत अभ्यास करत आहेत. तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म च्या मदतीने तयार झालेले सराव पेपरही देण्यात येत आहेत. त्यांची ही चांगली मदत विद्यार्थ्यांना होत आहे. 


*सुपर ग्रुप मधील स्पर्धा!*

इयत्ता चौथीतील लक्ष्मण पहिल्या स्पर्धेमध्ये 25 पैकी 25 गुण घेणारा एकमेव विद्यार्थी होता. त्याच्यासह चार विद्यार्थी या सुपर ग्रुप मध्ये होते. यावेळी सातवीतील तनुजा आणि पाचवीतील ओमराज यांच्यात तुल्यबळ लढत झाली. समान गुणावर दोघे आल्या नंतर त्यांची तोंडी परीक्षा झाली. चार पैकी तीन प्रश्नांना दोघांनी बरोबर उत्तर दिले आणि चौथ्या प्रश्नावर ओमराजला माघार घ्यावी लागली.

बुधवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. 


*निकाल :*

इयत्ता 4 थी: कु श्रावणी केशव मुंडे

इयत्ता 5 वी: चि स्वप्निल रमेश केंद्रे

(रनर अप: कु अमृता मारुती मुंडे) 

इयत्ता 6 वी: कु गायत्री भागवत मुंडे 

इयत्ता 7 वी: कु आराध्या पंढरी मुंडे 

सुपर ग्रुप: कु तनुजा दशरथ मुंडे 

(रनर अप: ओमराज बळीराम मुंडे)


*सर्व विजेत्यांचे आणि त्यांना मदत करणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!* 🎉🌹💐



















मिश्किल, मृदु स्वभावी गुलाबराव सरांचे असे अचानक जाणे....

वैद्यनाथ विद्यालयातील माधवबागच्या शाखेत शिक्षण घेतलेल्या जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रिय शिक्षक असलेले श्री गुलाबराव देशमुख सर... अगदी नावाप्रमाणेच त्यांच्या स्वभावात गुलाबाच्या सुगंधाची आणि कोमलतेची जाणीव व्हायची.... सद्गुणांचा सुगंध आणि मायेच्या ममतेने विद्यार्थ्यांशी बोलणे - वागणे यामुळे विद्यार्थ्यांना प्रिय झालेले शिक्षक... शिकवायचे इतिहास आणि हाती नसायचे पुस्तक! खळाळता प्रवाह जसा सहजगत्या पुढे जातो तसेच अगदी त्यांच्या तासात विद्यार्थी रममाण व्हायचे....

अमूक तमुक ढमूक.... हा त्यांच्या सहज बोलण्यात वापरला जाणारा शब्दप्रयोग मला वाटते विद्यार्थ्यांना आजही चांगलाच आठवत असेल ..... प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक ओळख आणि त्याच्याशी जोडलेले नाते, पाठ शिकवत असताना प्रसंगयोचित त्यांनी केलेले सात्विक विनोद यामुळे त्यांचा तास कधीच संपू नये असे विद्यार्थ्यांना वाटायचे.... त्यांचे अनेक माजी विद्यार्थी आजही त्यांच्या संपर्कात होते... त्यांचा तास अचानक असा 2 मार्च 2026 रोजी संपला....

अगदी काल-परवापर्यंत चांगले चालते - बोलते असणारे सर असे अचानक आपल्यातून निघून जातील असे त्यांच्या कुटुंबीयांना आणि विद्यार्थ्यांनाही वाटले नव्हते....

जवळपास प्रत्येक गुरु पौर्णिमेला सरांच्या भेटीचा निश्चय मी केलेला होता आणि मागच्या अनेक वर्षात घरी जाऊन त्यांच्याशी मनमुराद गप्पा ही मारायचो...

1993 ला माझे डीएड सुरू असताना अंबाजोगाईच्या बस स्टँडवर सरांची भेट झाली त्यावेळी 'इकडे कसे काय?' असे विचारल्यानंतर सरांनी एमए करत असल्याचे सांगितले... अखंड शिकत राहण्याचा मार्ग त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वानुभवातून दिला.

मागच्या साडेतीन-चार महिने अगोदर सरांच्या मिसेसचे निधन झाले.... सेवानिवृत्तीनंतर सरांचा घरी अधिक वेळ जायचा आणि दोघांचे नाते अधिकच दृढ झालेले होते... त्यावेळी आम्ही भेटायला गेल्यानंतर वहिनींच्या आठवणीत सर रडले होते.... विद्यार्थ्यांना जीवनातील विविध विषयाचे ज्ञान देणारे आमचे गुरु त्यावेळी किती भावनिक होते याची प्रचिती आली.... वहिनींच्या आठवणीतच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतल्यामुळे कदाचित लवकरच ते आपल्याला सोडून गेले....

माझ्या वयाच्या पन्नाशीत आजही कधी - कधी जेव्हा उदास वाटायचे तेव्हा सरांना भेटायला जायचो..... गप्पांतून प्रेरणा मिळायची, उत्साह वाढायचा....

10 वी 1991 बॅचच्या आदरणीय श्री गुलाबराव देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना... (अजूनही त्यांच्या नावापुढे कैलासवासी लावण्याची हिंमत होत नाही)  


चंद्रशेखर फुटके